काही दिवसांचा संसार क्षणात झाला उध्वस्त, नवदाम्पत्याच्या निधनाने परिसर हळहळला

सांगली : या धावपळीच्या जमान्यात कोणावर कधी संकट येईल हे सांगता येत नाही. इस्लामपूर मध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडप अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक मधील हलूर जवळील जत-जांबोटी या महामार्गावर हा भयानक अपघात घडला आहे. लग्न झाल्यानंतर देवदर्शन करून घरी येत असताना काळाने या नवीन जोडप्यावर घाला घातला. इंद्रजीत मोहन ढमणगे (वय २९) आणि कल्याणी इंद्रजीत ढमणगे (वय २४) असं अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नवरा नवरिचे नाव आहे. तर या अपघातामध्ये मृत इंद्रजीतचे आई-वडील दोघेही जखमी झाले आहेत.
इस्लामपूर मध्ये राहत असलेला इंद्रजीत यांचा १८ फेब्रुवारी रोजी कल्याणी बरोबर लग्न झालं होत. अगदी मोठ्या आनंदात आणि थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला होता. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने आपल्या कुलदैवत असणाऱ्या कर्नाटक मधील शाकांभरी देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. या योजनेनुसार इंद्रजीत आणि कल्याणी तसेच इंद्रजित याचे आई-वडील देवदर्शन करण्याकरिता गेले होते.
देवीचे दर्शन घेवून परतत घरी येत असताना गुर्लापूर ता. मुडलंगी पर्यंत ते सर्वजण सुखरुपपणे आले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची आणि इंद्रजीत यांच्या कारची समोरा-समोर भयानक धडक झाली. या अपघातामध्ये इंद्रजित व कल्याणी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघे नावदाम्पत्य जागीच ठार झाले. तसेच इंद्रजीतचे वडील मोहन व आई मिनाक्षी हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहे.
हा अपघात शनिवारी दुपारी ३ वाजता घडला आहे. मृत कल्याणी यांचे माहेर कोल्हापुरातील इचलकरंजी आहे, तर इंद्रजीत हे मुंबई येथे टीसीएस कंपनीमध्ये जॉन करत होते. रविवारी पहाटे इस्लामपूर या ठिकाणी नवविवाहित जोडप्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृत इंद्रजीतचे जखमी वडील मोहन व आई मिनाक्षी यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.नवीन जोडप्याच्या मृत्यू मुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.