Fact Check | शरमन जोशीने घेतला जगाचा निरोप?
दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच खोट्या अफवा पसरवण्याचे सत्र सुरू असते. यामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांवरून अफवा पसरवली जाते. गेल्या काही वर्षांपासून कलाकारांच्या मृत्यूची अफवा बऱ्याचदा पसरली गेली आहे. अशा अफवा ऐकल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडते.
तसेच भीतीचे वातावरण तयार होते. एखादा कलाकार जिवंत असून देखील त्याच्या निधनाची बातमी दिली जाते. यामुळे त्या कलाकाराला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. आता हाच प्रकार प्रसिद्ध अभिनेता शरमन जोशी बरोबर देखील घडला आहे.
शरमनने आजवर बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याची प्रसिद्धी आणि त्याचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. असे असले तरी सध्या माध्यमांवरती त्याच्या निधनाची बातमी व्हायरल झाली. त्याची ही बातमी वाचून अनेकांनी त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर बऱ्याच व्यक्तींनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली. हा सर्व प्रकार फार निंदनीय आहे. ठरवून शरमन बद्दल अशी अफवा पसरवली जात आहे.
शरमनने ‘रंग दे बसंती’, ‘गोलमाल’ आणि ‘3 इडियट्स’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्याचे लग्न झाले. त्याने बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले प्रेम चोप्रा यांच्या मुलीबरोबर विवाह केला. त्याच्या पत्नीचे नाव प्रेरणा चोप्रा असे आहे. या दोघांना तीन मुलं देखील आहेत. ख्याना ही त्यांची मुलगी असून विहान आणि वरहान ही याची दोन जुळी मुलं आहेत. शर्मनची बहीण मानसी जोशी देखील एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि तिने अभिनेता रोहित रॉयशी लग्न केले आहे.
काही दिवसांपूर्वी शरमनचे सासरे प्रेम चोप्रा यांच्या विषयी देखील अशा पद्धतीची अफवा पसरवली गेली होती. यावेळी त्यांना बॉलीवूडमधील अनेक दिग्गज मंडळींचे फोन कॉल येऊ लागले. त्यावेळी प्रेम चोपडा यांचा खूप संताप झाला. त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन ही एक अफवा आहे असे स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या जावई बद्दल अशी अफवा पसरवली जात आहे.